‘मायेची सावली’ पुस्तकाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रेरणादायी प्रकाशन सोहळा

‘मायेची सावली’ पुस्तकाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रेरणादायी प्रकाशन सोहळा
मुंबई | प्रतिनिधी
मुक्ताईनगरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार छबिलदास पाटील लिखित ‘मायेची सावली’ या हृदयस्पर्शी आणि मूल्याधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर अत्यंत उत्साहात पार पडला.
या वेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार मा. चंद्रकांत पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, माफदा प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ, छोटू भोई, नवनीत पाटील, किशोर चौधरी, तसेच संत मुक्ताई पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शरद बोदडे, सचिव संदीप जोगी, राजेश चौधरी, निलेश मेढे, अमोल वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात म्हटले, “समाजात मूल्यांची जपणूक करणारे लेखन काळाची गरज आहे. छबिलदास पाटील यांनी लिहिलेलं हे पुस्तक युवकांना विचार करायला लावणारे आणि मार्गदर्शन करणारे आहे.”
आमदार चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “‘मायेची सावली’ हे पुस्तक मुलांना आई-वडिलांविषयी आदर, प्रेम आणि जबाबदारीची जाणीव करून देणारं आहे. अशा लेखनातून समाजात सकारात्मक बदल घडतो.”
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखकाच्या सामाजिक भान आणि लेखनकर्तृत्वाची स्तुती करत त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
‘मायेची सावली’ हे पुस्तक म्हणजे केवळ एक साहित्यिक कृती नसून, आजच्या यांत्रिक आणि स्वार्थी जीवनशैलीत हरवत चाललेल्या आई-वडिलांप्रतीच्या कृतज्ञतेला उजाळा देणारा एक भावनिक आणि मार्गदर्शक प्रवास आहे.
लेखक छबिलदास पाटील यांनी आपल्या लेखणीतून अत्यंत संवेदनशीलतेने सांगितले आहे की, “आई-वडील हे देवतुल्य असतात. त्यांची सेवा करणे, त्यांचा सन्मान राखणे हीच खरी संस्कृती आहे.”
प्रत्येक युवकाने हे पुस्तक वाचून आत्मपरीक्षण करावे, आपल्या पालकांविषयी आदरभाव ठेवत समाजात एक सकारात्मक दृष्टिकोन रुजवावा, असा या पुस्तकाचा मूळ उद्देश आहे.